सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

घरवापसी चळवळीला दोन वर्षे झाली.... विठ्ठल साठे.


मातंग वंश हा जैन परंपरेतील वंश आहे. प्राचीन काळापासून आहे. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब मातंग वंश आणि प्रस्थापित जैन यांना सांगावी, सबंध भारतात असलेल्या मातंग वंशास पुन्हा त्याच्या मूळ घरी आणावं, मातंगवंशातील लोकांना जैन परंपरा समजावून द्यावी, जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा असे वाटल्यामुळे एक संघटन उभे राहिले -जैन विचार मंच.


मातंग आणि जैन ? हा हिमालयासारखा प्रश्न ! केवळ सहज सांगितले तरी प्रचंड धक्का बसत होता. आकाशात उंच न्यावे आणि खाली सोडून द्यावे. तसं काही तरी ! ना मातंग विश्वास ठेवणार ना जैन ! कारण सांप्रतचा मातंग समाज ज्या अवस्थेत दिसून येतो. त्याच्याकडे बघीतल्यावर त्याला जैन म्हणणे म्हणजे आपण नुकतेच वेड्याच्या इस्पितळातून बाहेर पडलो आहोत. याचा पुरावा देण्यासारखे ! परंतु सत्य ते सत्यच ! जैन आगम ग्रंथाच्या अनेक पानावर मातंग आढळून येतो. ते ग्रंथ काल परवा लिहिलेले नव्हते. शेकडो वर्षांपूर्वी लिहिले होते. आणि कुणी तरी फुटकळ संशोधकांनी लिहिले नव्हते .किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी लिहिले नव्हते. अतिशय उच्च कोटींच्या विद्वानांनी ते लिहिले होते/लिहिले आहेत. आचार्य, मुनी या पदाला पोहोचलेल्यांनी लिहिले आहेत ! ओढूनताणून मातंग वंशाला मोठे करण्यासाठी सुद्धा लिहिले नाहीत. हे स्वच्छ सत्य आहे. मग हे सत्य मातंग वंश आणि जैन यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे असा रास्त विचार मनात आला. त्या विचाराने ' जैन विचार मंच ' ची स्थापना करण्यात आली.या मंचाच्या कार्यात प्रस्थापित जैन आणि मातंग वंशातील लोक सामील झाले. जैन विचार मंचाच्यावतीने एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. परंतु ही चळवळ फारसे महत्त्व द्यावे अशी नाही असे समजून किरकोळ प्रसिद्धीच्या पलीकडे काही होऊ शकले नाही. आम्ही सुद्धा फारसे लक्ष दिले नाही. कारण प्रसिद्धी ही खूप भयानक बाब आहे. तिचा हव्यास धरला की मग मूळ कार्य बाजूला फेकले जाण्याची शक्यता जास्त असते. एक प्रकारचे व्यसनच असते ते ! असो!
चळवळ सुरू केली आणि कार्यक्रम आयोजित केले:-

१) पुण्यातील गुरूवार पेठेतील जैन मंदिरात मातंग वंशातील महिलांनी आरती केली.
२) तळेगांव येथील पार्श्वप्रज्ञालय जैन मंदिरास भेट.
३) आचार्य विश्वकल्याण विजयसूरीश्वरजी यांच्याशी चर्चा.
४) भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवात सामील.
५) आगमवेत्ता 'आत्मा 'साध्वी वैभवश्री यांची भेट.
६) महावीर प्रतिष्ठान येथे प्रारंभ केलेल्या चातुर्मास मिरवणुकीत सामील.
७) आदरणीय साध्वी वैभवश्री यांचे मातंग वंशावर प्रवचन. विषय -समण संस्कृती और मातंग वंश.मातंग वंश समण संस्कृती का अभिन्न अंग है.
८) महावीर प्रतिष्ठान येथे माझे भाषण. मातंग वंश हा कसा जैन आहे. याविषयी!
९) आदरणीय पुलकसागर महाराज यांच्या भेटी व चर्चा.
१०) जैन विचार मंच मधील जैन बांधवांचा सत्कार.
११) सातारा येथे मंदिर निर्माण कार्य.
१२) भगवान श्री सुपार्श्वनाथ अहिंसा चँरेटेबल ट्रस्ट. सातारा. ची स्थापना.
१३) जैन धर्मात मातंगवंशातील परिवारांचे स्थितीकरण प्रारंभ.गांधी भवन येथे स्थितीकरण कार्यक्रम.
१४) भगवान ऋषभनाथ यांचा आहार समारंभ.(अक्षय तृतीया )
१५) भगवान महावीर यांची जयंती ( जन्म कल्याणक.) उत्साहात साजरी.
१६) भारतातील महान विद्वान आदरणीय डॉ. प्रियकर जैन यांची वेरुळ येथे भेट.
१७) भगवान महावीर निर्वाण कल्याणक.
१८) सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, रायगड, या जिल्ह्यात जैन विचार मंचाच्या शाखा स्थापन.
१९) शिबीर आयोजित.
२०) रक्तदान शिबिरात रक्तदान.
२१) कोल्हापूर येथे आयोजित पंचकल्याणकमधे सहभाग.
२२) सातारा येथे आयोजित दशलक्षणपर्वात सहभाग.
२३) महावीर प्रतिष्ठान येथे जैन बांधवाचे शंका समाधान कार्यक्रम.
२४) आता पर्यंत १७८परिवारांचे स्थितीकरण.
२५) २०१९ चा दसरा 'अरिहंत वंदन दिन 'म्हणून साजरा करण्यात आला.
२६) भारतीय स्तरावरील श्री दिगंबर जैन आर्हत धर्मपीठ. राजस्थान. या संस्थेवर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
२७) दर रविवारी जैन धर्मासंबंधी अभ्यासवर्ग.

आणखी बरेच कार्यक्रम राबविण्यात आले. सर्व नमूद केले तर यादी खूप मोठी होईल.


आमची चळवळ क्रांती घडवित आहे. एका दबलेल्या, पिचलेल्या, दूर लोटलेल्या समाजाला त्याची खरी ओळख करून देत आहे. जो मूळातच प्रतिष्ठित होता आणि श्रेष्ठ परंपरेतील होता.त्याला पुन्हा ती प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्व मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.काम कठीण आहे. एका वेगळ्या संस्कारात पिढ्यानपिढ्या व्यतित झालेल्या समाजाला एकदम विरुद्ध दिशेला नेणे सोपं नव्हतं.पण आम्हाला यात अशक्य काही वाटत नाही.

दोन वर्षात १७८परिवारांनी घरवापसी केली. ही खूप खूप उत्साहवर्धक घटना आहे. 'जय जिनेंद्र ' कधीही ऐकलेले नसलेल्या समाजात 'जय जिनेंद्र ' अभिमानाने म्हटलं जातं. लोक सकाळी आणि संध्याकाळी णमोकार मंत्र म्हणतात. मांसाहारी घराशी सोयरीक करीत नाहीत. व्यसनी घराशी संबंध ठेवत नाहीत. वेळ मिळेल तसे जैन मंदिरात जातात. दर्शन घेतात.प्रवचने ऐकतात. मुले शाळेत दाखल करताना धर्म -जैन लिहितात. जात-जैन लिहितात. आणि या सर्वापेक्षा ताण म्हणजे ते मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या सवलतींचा अर्ज सादर करीत नाहीत. अर्थात आम्ही त्यांना हे सर्व करणे शक्य असेल तरच घरवापसी करा. असे प्रामाणिकपणे सांगितले आहे. हे करणे शक्य नसेल तर घरवापसीची गरज नाही. हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. करतोच. कारण ही स्टंटबाजी नाही! प्रसिद्धीसाठी केलेला बनाव नाही! हे अत्यंत पवित्र कार्य आहे आणि ते तितक्याच पवित्र भावनेने केले पाहिजे. याची आम्हा सर्वांना जाण आहे आणि भान सुद्धा आहे.

सूर्य कुणी विकत घेऊ शकत नाही. पण त्याच्या प्रकाशात जाऊन उभं तर रहाता येईल की नाही ? आणि एकदा प्रकाशाची मैत्री झाली की मग अंधाराच्या वेदनांचे स्मरण होत नाही असा आमचा विश्वास आहे. या दोन वर्षात प्रकाश वाटेवर पडलेली पावलं मुक्तीच्या मंदिराकडे नेत आहेत !

-विठ्ठल साठे.
उपाध्यक्ष, श्री दिगंबर जैन आर्हत धर्मपीठ, राजस्थान.
निमंत्रक, जैन विचार मंच.
अध्यक्ष, भगवान श्री सुपार्श्वनाथ अहिंसा चँरेटेबल ट्रस्ट, सातारा

हेही वाचा:

२ टिप्पण्या:

  1. सर,घरवापसी केल्यावर जे अगोदरचे जैन मंडळी आहेत ते आपल्या सोबत रोटी,बेटी वेव्हार करतील का?

    उत्तर द्याहटवा
  2. Hello sir mi vinod subhash sable cast matang at post Kurunda tq basmath dist hingoli ani mi well educated aahe tumchi hi chalaval mhanje ek tejaswi prakasha sarkhi aahe. mahavir tatvadnyan he khup chan aahe ani aaple tar purave ya jain dharamat aahet mhanun vithal sathe sir yanche purn video pahile.tyyani khup chan ase sangitale ki, jain dharmat yene mhanje ghar vapsi ahe ani aapli mul je aahe jain dharmat aahe mala khup chan vatal ani ek chan marg aahe.jain dharm ahinsa,karuna,kshama,shanti hya tatvavar chalnara aahe. Mi kahi varsha pasun shakahari aahe ani mala mahavir yanche tatvadnyan bhavle mi lavkar ghar vapsi karel. Jai jinendra

    उत्तर द्याहटवा

Popular Posts